Monday, January 17, 2022

डॉ. एन. डी. पाटील





*महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीचे मार्गदर्शक उपेक्षित वंचित वर्गाचे आधारवड पुरोगामी विचारांचे लढवय्ये नेतृत्व डाॕ.एन डी पाटील सर हे महाराष्ट्राला पोरके करून गेले त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख*

*पुरोगामी विचारांचे वादळ -डाॕ.एन.डी पाटील सर* 

             *प्रा .डॉ.एन. डी.पाटील सर .९४ वर्षाचा तरुण योद्धा, एकाच किडनी वर लढणारे, मधुमेहाशी सामना करणारे, खुब्याचा सांधा दोन वेळा शस्त्रक्रिया करून बदललेला असतानाही अखंड महाराष्ट्रभर अविरत प्रवास करणारे,देशभरातील वेगवेगळ्या लढ्यांना पाठबळ देण्यासाठी तेथे पोहोचणारे,आपल्या पहाडी वक्तृत्वाने आंदोलनात ऊर्जा पेरणारे,समाजातील उपेक्षित, वंचितांच्याठाई आंतरिक उमाळा जपत त्यांच्यासाठी लढणारे,अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे, शेतकरी कामगार पक्षाकरिता आपली व्यक्तिगत मिळकत खर्च करणारे,रयत शिक्षण संस्था हा माझा प्राण आहे आणि जीवात जीव असेपर्यंत रयतचे हितच जोपासत राहणार या दृढ संकल्पसह रयत शिक्षण संस्थेच्या हितासाठी आयुष्य वेचणारे,आपल्या तत्त्वांवर निष्ठा ठेवून कधीही तत्वांशी तडजोड न करता प्रामाणिक आयुष्य जगणारे,शुद्ध चारित्र्याचे, निर्भीड मनोवृत्तीचे,कणखर बाण्याचे एक उत्तुंग आणि अफाट व्यक्तीमत्व.*

         *ज्यांनी स्वतःची वेगळी वाट निवडली आणि याच वाटेवर ते चालत राहिले. विशेषता सामान्य माणसं मळलेल्या वाटेवरून प्रवास करतात कारण त्यांना हा प्रवास सुरक्षित आणि सुलभ वाटतो तर असामान्य माणसे मात्र स्वतःच्या वेगळ्या वाटा निर्माण करतात. त्यांना माहित असतं हा प्रवास खडतर आहे, पाय रक्तबंबाळ करणारा आहे,आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेणार आहे.तरीही ते हा प्रवास आनंदाने करतात.स्वतःच्या वेगळ्या वाटेवरचे आनंदयात्री म्हणजे डॉ. एन डी पाटील सर. यांनी वाटेतले काटे कुठे दूर केले, स्वतःच्या हिकमतीने खाच-खळगे भरले, वळण वाटा सरळ केल्या, त्यांची ही वाट गोरगरिबांसाठी, समाजातील 'नाही रे 'वर्गासाठी आहे. त्यांची ही वाट ,वाटेवरचा प्रवास, प्रवासातील सांगाती,प्रवासातील अनुभव फारच विलक्षण आणि प्रेरणादायी आहे हा प्रवास जाणून घेऊया नारायण.*

      *नारायण ज्ञानदेव पाटील तथा एन डी पाटील साहेब यांचा जन्म ५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील ढवळी या गावी झाला.त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण ढवळी येथे झाले. यावेळी पांडुरंग धोंडी परीट हे त्यांचे शिक्षक होते. चौथी पास झाल्यानंतर पाचवीसाठी गावापासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बागणी शाळेत त्यांना घातले गेले. ही शाळा सातवी पर्यंत होती. या शाळेचे वैशिष्ट म्हणजे तिथे असणारे काळू सावता माळी हे  शिक्षक.माळी गुरुजींच्या वर सत्यशोधक चळवळीचा प्रभाव होता. ते पुरोगामी व बंडखोर विचारांचे होते. त्यांचा प्रभाव एन.डी. पाटील सर यांच्यावर पडला. पुरोगामी विचारांचं बाळकडू त्यांना येथेच मिळाले. सातवी झाली आता पुढील शिक्षणाचा काय?कारण जवळपास शिक्षणाची सोय नव्हती.गावा पासून आठ किलोमीटरवर आष्ट्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे हायस्कुल होते .त्या हायस्कूलमध्ये आठवीसाठी प्रवेश घेतला. रयतचा परिसस्पर्श झाला आणि त्यांच्या पुरोगामी विचारांच्या सोनेरी प्रवासास प्रारंभ झाला. शाळेतील वेताळ राव खैरमोडे सरांच्या मुळे वाचनाची सवय लागली. वाचनामुळे चिकित्सक विचार करण्याची वृत्ती अंगी बानू लागली. सत्यशोधक विचारांचे बीज अंतःकरणात रुजू लागलं. त्याला शाळेतील पुरोगामी वातावरणामुळे अधिक बळ मिळू लागले. त्याच्या शाळेत जाणत्या वयात जे संस्कार मिळाले त्यातून त्यांच्या भविष्यातील जीवनाचा पाया मजबूत झाला. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर गाठले.राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला .त्या काळात कोल्हापूर हे राजकीय व सामाजिक चळवळीचे केंद्र होतं .छत्रपती शाहू महाराजांच्या या भूमीत अनेक पुरोगामी चळवळींना जोर धरला होता. राष्ट्र सेवा दल, काँग्रेस, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट चळवळी यांचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू होतं. सरांचा पिंड हा सामाजिक चळवळीचा असल्याने ते या चळवळीकडे ओढले गेले. त्यांच्या उपक्रमात सहभागी होऊ लागले. त्यावेळी जनसत्ता नावाचं एक साप्ताहिक कोल्हापुरातून निघायचं.चौकात उभे राहून, ओरडून या साप्ताहिकाची विक्री एन डी पाटील सरांनी केली. शिक्षणासोबत सामाजिक कार्यातील सहभाग वाढत गेला. सामाजिक जाणिवांचा परीघ विस्तारत होता. शेती, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या प्रश्नांबाबत मनात उमाळा दाटत होता. तारुण्याचा जोशाला मनातल्या धगीची साथ मिळत होती. ३ ऑगस्ट १९४७ रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. या पक्षाच्या स्थापनेतील नेतृत्वांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. आपणही समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी आयुष्य वाहून घ्यायचे असे त्यांनी मनोमन ठरवले. शेतकरी कामगार पक्षाच्या सांगली शाखेच्या स्थापना बैठकीला उपस्थित राहिले. येथूनच त्यांच्या शे का प च्या कार्याला सुरुवात झाली.*

       *ते बी ए उत्तीर्ण झाले. याच वेळी त्यांच्या वडिलांचे आणि भावाचे निधन झाले.अशा वेळी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. या क्षणाला कर्मवीर भाऊराव पाटील पुढे आले आणि त्यांनी सरांना आष्ट्याच्या  ट्रेनिंग कॉलेजमध्ये नोकरी दिली. नोकरी करत करत ते एम ए झाले. पुढे एल एल बी सुद्धा केली. १९५४ साली छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे प्राध्यापक म्हणून ज्ञानदान करू लागले. १९६०साली इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य झाले.१९५९ पासून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य असणारे एन डी सर  सन १९९० ते २००८ या संस्थेचे चेअरमन होते .२००८ पासून कार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळत होते. १९६० ते ६६,१९७०  ते ७६ आणि १९७६ ते १९८२ अशी तब्बल १८वर्ष महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार राहिले आहेत. १९७८ते ८० या कालावधीत महाराष्ट्राचे सहकार मंत्री म्हणून कार्य केल आहृ. १९८५ते ९० या कालखंडात ते महाराष्ट्राच्या विधान सभेचे आमदार होते. महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समितीचे सदस्य आणि सीमा चळवळीचे प्रमुख नेते होते. त्यांच्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सह अनेक पुरोगामी विचारांच्या संस्थांचे अध्यक्षपद होतं.*

       *मिळालेली सत्ता, मिळालेली पदे ही मिरवण्यासाठी नसून ती सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आहेत या तत्वज्ञानात सह त्यांचं जगणं होतं. त्यांच्यामुळे अनेक पदांची उंची वाढली आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य तत्त्वांची साखळी आहे.जी अखंड होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक पैलू आपणा सर्वांसाठी दीपस्तंभासारखी आहेत.ज्यायोगे आपण आपलं आयुष्य समृद्ध बनवू शकतो.*

         *अखंड वाचन,सखोल अभ्यास,निरंतर चिंतन आणि मनन यामुळे प्रत्येक विषयाबाबत त्यांची स्वतःची मते होती.त्यांच्या चिंतनाचा, मननाचा गाभा हा सामान्य माणूस होता. समाजातील 'नाही रे'वर्गाबाबत त्यांच्या मनात कणव होती. जागतिकीकरणामुळे या 'नाही रे' वर्गातील माणसं परिघाच्या बाहेर फेकली जात आहेत याचे शल्य त्यांच्या मनात नेहमीच होत.शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाची त्यांची निश्चित अशी भूमिका होती. विकासाची उंची वाढण्यापेक्षा त्याचा पाया विस्तारला पाहिजे,सामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे, त्याच्या सामाजिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत ,या विचारांचा ते सातत्याने उद्घोष करायचे.विचारांच्या या बैठकीमुळे एन डी पाटील सरांचे वक्तृत्व हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरायचे. त्यांच्या सरांच्या अमोघ वक्तृत्वाची अनेकांना भुरळ पडायची.*

          *शब्द हे शब्द असतात पण जेव्हा शब्दांना तत्वांचा स्पर्श होतो, आचारांचे बळ मिळतं तेव्हा ते शब्द शब्द राहत नाहीत तर ते शब्द अस्त्र बनतात.जे समाजातील अन्यायावर प्रहार करतात,हेच शब्द अनेकांना संघटित होण्याचे, लढण्याचे बळ देतात.सरांच्या  शब्दांनी उपेक्षित, वंचित, पददलितांच्या चळवळींना  संघर्षांची प्रेरणा आणि ऊर्जा दिली आहे. त्यांच्या पहाडी आवाजाने हतबल झालेली ,आत्मविश्वास गमावलेली सामान्य माणसं लढण्यासाठी सज्ज व्हायची, उपाशीपोटी लढत राहायची आणि जिंकायची सुद्धा. सरांच्या शब्दांच्या जोरावर अनेक चळवळींचा लढ्यांना यश मिळाले आहे.आंदोलन आणि सरांचे भाषण एक सूत्र होतं. ते आपल्या धीरगंभीर आवाजाने श्रोत्यांचे चित्त वेधून घ्यायचे, हलक्याफुलक्या विनोदानं वातावरण हलकं फुलकं करायचे ,सर्वस्पर्शी विवेचनातून ऐकणाऱ्यांना विचार करायला भाग पाडायचे. दैनंदिन जीवनातील उदाहरणे आणि दाखले देऊन श्रोत्यांच्या हृदयाला हात घालायचे, त्यांचा आतला आवाज जागा करायचे आणि आपल्या वाणीतून अपेक्षित इप्सित साध्य करून घ्यायचे. सरांचे भाषण हे कधीच मनोरंजनासाठी नसायं तर आत्म चिंतनासाठी असायचं. त्यांचे शब्द श्रोत्यांना रक्तबंबाळ करायचे नाहीत, कोरडे पेटवण्याचा उद्योग करायचे नाहीत तर संघर्षासाठी पेटून उठवण्याचे काम करायचे. त्यामुळेच त्यांच्या शब्दांनी सर्व सामान्यांच्या मनात न्यायासाठी लढण्याची ,झुंजण्याची प्रेरणा दिली आहे.*

               *त्यांच्या भाषणाचे अनेक असे प्रसिद्ध आहेत त्यातील एक किस्सा*      

        *१९७७  साली लोकसभा निवडणुकीत शे का पक्षाचे उमेदवार दाजीबा देसाई यांची प्रचार सभा कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात होती. लाखभर लोकांनी बिंदू चौक खचाखच भरला होता. या सभेचे प्रमुख पाहुणे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब होते. ते रात्री नऊ वाजता भाषणासाठी उपस्थित राहणार होते. रात्रीचे नऊ वाजले तरी ते आले नाहीत.समोर लोकांची तुडुंब गर्दी, लोकांना पवार साहेब येईपर्यंत खेळवून ठेवणं गरजेचं होतं. तात्पुरता बदली खेळाडू म्हणून एन डी  पाटील सरांच्या कडे माईक सुपूर्द करण्यात आला.एन डी सरांनी  आपल्या फटकेबाजीला सुरुवात केली. नऊ चे दहा झाले, दहाचे अकरा ,अकरा चे बारा असे करत करत पहाटेचे तीन वाजले. पहाटे तीन वाजता पवार साहेब सभास्थळी आले. नऊ ते तीन तब्बल सहा तास एन डी पाटील सर बोलत होते.या कालावधीत एकही माणूस जागचा हलला नाही. यातून सरांचा अभ्यास ,व्यासंग'वक्तृत्वा ची पकड आणि सहा तास बोलण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक सुदृढता याची साक्ष पटते. त्या दिवशी त्यांच्या अमोघ वाणीनं बिंदू चौकात एक नवा इतिहास घडविला.*

              *सरांचा आणखी एक गुण अधोरेखित करावा वाटतो तो म्हणजे त्यांचे स्वाबलंबन. एन डी पाटील सर स्वतःची अनेक कामे स्वतः करत. छोट्या छोट्या कामांसाठी इतरांवर अवलंबून राहणे त्यांना आवडत नसायचे.ते सहकार मंत्री असताना घडलेला प्रसंग .सावंत नावाचे त्यांचे सहकारी त्यांना भेटायला गेले होते. यावेळी रूम मध्ये कोणीच नव्हतं पण बाथरूम मधून कपडे धुण्याचा आवाज येत होता. काही वेळानं एन डी पाटील सर बाहेर आले. पण या सावंतानी काही विचारण्यापूर्वीच ते बोलू लागले' "अहो सकाळपासून कोणीच भेटायला आलेले नाही .मी एकटाच आहे. चला आपलं काम उरकून घेऊ म्हटलं' निवांतपणे कपडे धुतले.*"

       *महाराष्ट्राचे सहकार मंत्री स्वतःचे कपडे स्वतः धूत  होते ,हे सावंत यांना सुद्धा स्वप्नवत वाटलं असेल. एन डी पाटील सर नेहमीच स्वतःचे कपडे स्वतः धूवायचे. तेही स्वच्छ आणि चकचकीत.*

      *त्यांच्याकडे नेहमीच कमीत कमी ड्रेस असायचे. गरजा मर्यादित ठेवायच्या या त्यांच्या विचारानुसार त्यांचं वर्तन होतं. त्यांच्या गाडीतील बॉक्समध्ये सुई, दोऱ्याची गुंडी, शर्टची बटनं ,ब्लेडचे अर्ध पातं, सिसपेन्सिल खोडरबर ,काचेची छोटी पट्टी, साधे पेन, टाचण्या हे साहित्य नेहमी असायचं. यातून त्यांचा बारकावा सुद्धा लक्षात येतो*.

          *'माणसाला जगायला किती आणि काय लागतं' हा त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन.माणसांने आपल्या गरजा विनाकारण वाढवायच्या नाहीत. मर्यादित गरजांमध्ये आपण आनंदाने जगायचं हे त्यांचं तत्त्व. अत्यंत काटकसर करून मजेत कसं जगता येतं हे त्यांनी दाखवून दिले. या संदर्भातील काही प्रसंग*

     🔹 *आष्ट्यातील शिक्षकाची नोकरी सोडली आणि ते गिरणी कामगार युनियनचे सेक्रेटरी झाले. या पदासाठी त्यांना महिन्याला 45 रुपये जीवन वेतन मिळायचं एवढ्या रकमेत दोन वेळचं जेवण शक्य नाही हे ओळखून ते एक वेळ जेवायचे आणि एक वेळ मिसळ किंवा वडा पाव खायचे. आपल्याला एक वेळ वडापाव खावा लागतो याचं त्यांना कधीच वाईट वाटलं नाही तर किमान एक वेळ जेवायला मिळतं याचं समाधान वाटायचं*. 

          🔹 *आपली संपूर्ण मिळकत शे का  पक्षासाठी खर्च करणाऱ्या एनडी सर नेहमी आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करायचे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाल्यावर त्यांचं मानधन 300 वरून अठराशे रुपये झाले.पंधराशे रुपयांची वाढ झाली. वाढलेली ही रक्कम ते आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या खर्चासाठी वाटायचे आणि त्याच्या नोंदी नोंदवहीत ठेवायचे. नेता कसा असावा याचे हे आदर्श उदाहरण.*

         *साधेपणा तर सरांच्या नसानसात भिनला होता.*

          🔹 *आमदार असतानाही एसटीतून प्रवास करताना गर्दीमुळे बसायला जागा नसेल तर ते उभे राहून प्रवास करायचे*

          🔹 *मुंबईमध्ये आमदारांसाठी घरे देण्यात आली पण काही कोटी रुपयांचे मुंबईतील घर सुद्धा त्यांनी नाकारले.*

         🔹 *ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते, सध्या कार्यवाह पदाची जबाबदारी होती. संस्थेच्या कामासाठी सतत दौरे सुरू असायचे; पण ड्रायव्हरचा खर्च सोडता सर्व खर्च स्वतः करायचे संस्थेकडून कसलेही मानधन त्यांनी घेतले नाही.*

     🔹 *मंत्रीपद मिळाल्यानंतर लाल दिव्याची गाडी त्यांनी नाकारली*

      🔹 *मुंबईत शासकीय निवासस्थान नाकारून स्वमालकीच्या 350 चौरस फुटाच्या घरांमध्ये पंचवीस वर्षे राहिले*. 

       🔹  *त्यांना कोल्हापुरात मानाचा शाहू पुरस्कार मिळाला. पुरस्काराची रक्कम 51000 होती. या रकमेमध्ये स्वतःचे 5000 घालून ती रक्कम त्यांनी रयत शिक्षण संस्थेला दिली*.

            *असे अनेक प्रसंग आहेत जे त्यांच्या मनाच्या श्रीमंतीची साक्ष देतात.*

         *त्यांनी आजपर्यंत अनेक मानाची पदे भूषवली पण यातील कोणत्याही पदाचा  वापर स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. माझी प्रतिष्ठा ही समाजाने दिलेली आहे. मिळालेली प्रतिष्ठा ही कोणीही आपली खाजगी बाब मानू नये,अगदी मी, माझ्या मुलांनी, नातवंडांनी सुद्धा. त्यामुळे या प्रतिष्ठेचा वापर किंवा उपयोग खासगी कारणासाठी कोणी करून घेऊ नये. कारण ही समाजाने दिलेली असल्यामुळे त्याचा वापर समाजासाठी झाला पाहिजे हे त्यांचे विचार आणि या विचारानुसार असेच त्यांचे आचार.आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा,अधिकारांचा वापर त्यांनी कधीच स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही.*

              *त्यांच्या मोठ्या चिरंजीवाला मेडिकलला जायचं होतं पण एक दोन मार्क र् कमी पडत होते.त्यावेळी एन डी  पाटील सर सहकार मंत्री होते, मामा शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री पण यापैकी कोणत्याही ही वशिल्याचा वापर केला नाही. मेडिकलला सोडचिठ्ठी देऊन इंजिनिअरिंग कडे जावे लागले ,तोही प्रवेश नागपुरात .ठरवलं असतं तर सांगलीच्या वालचंद कॉलेजच्या राखीव जागेवर ऍडमिशन घेता आलं असतं पण मेरीट नुसार नागपूरला मिळाले, त्यांच्या चिरंजीवांनी कोणतीही कुरबूर न करता आपलं शिक्षण नागपूरमध्ये पूर्ण केले, वडिलांचा विचार कृतीमध्ये उतरवणारे त्यांचा चिरंजीवही तितकेच ग्रेट.*

       *विचारांची पक्की बैठक, आपल्या तत्वांवर अढळ निष्ठा, त्यागी आणि समर्पित जीवन ,प्रामाणिक आणि निरपेक्ष प्रयत्न ,निर्भीड आणि निर्भय स्वभाव या जोरावर एनडी पाटील सरांनी अनेक लढ्यांना बळ दिले. झुंडशाही, एकाधिकारशाही, पैसा ,सत्ता किंवा मदमस्त गुंडगिरीशी दोन हात करण्याची धमक आणि जिगर असणारे हे लढवय्ये सेनापती शोषितांचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं यशस्वी झाली.*

      ▪️ *एनराॕन विरुद्धचा लढा* 

      ▪️ *रायगडमधील शेज विरुद्ध चे आंदोलन*

      ▪️ *वीज दरवाढीविरोधात आंदोलन*

      ▪️ *सीमावासियांसाठी सुरू असलेला लढा*

      ▪️ *कोल्हापुरातील टोलविरोधी आंदोलन*

*अशा अनेक आंदोलनांचं नेतृत्व करत, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम एन डी  पाटील सरांनी केलेलं आहे .वयाच्या नव्वदीत नंतर सुद्धा ते रस्त्यावरची लढाई लढत होते.*

           *आज एन डी पाटील सर आपल्यातून निघून गेलेत; पण एनडी पाटील सर यांचे विचार,त्यांनी उभारलेले लढे त्यांचे कार्य हे आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.एन डी पाटील सर यांनी शोषितांच्यासाठी ,वंचितांच्यासाठी जे कार्य केलं ,समताधिष्ठित समाजाच्या रचनेसाठी जे लढे उभारले, तत्वांशी तडजोड न करता आदर्श जीवन कसा असावा याचा वस्तुपाठ निर्माण केला. सरांनी पेरलेल्या या विचारांवरच चालत राहून आपणही सामाजिक जीवनात वावरताना कृतिशील रहावं हीच एन डी पाटील सर यांना कार्यांजली ठरेल*.

  या क्षणी गुरु ठाकूर यांच्या ओळी आठवतात

*करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना*

*गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना* 

*क्षण कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर* 

*असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर*

✍️ *आदरणीय एन डी पाटील सरांच्या विचारांवर व कार्यावर प्रेम करणारा चाहता.*


No comments:

Post a Comment