Tuesday, September 13, 2022

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी Indira Gandhi




 प्रियदर्शनी इंदिरा गांधी : एक झंझावात 

मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे ।

तुझ्या यशाचे पवाड गातील तोफांचे चौघडे ॥


                                    एखाद्या स्त्रीने प्रजासत्ताक गणराज्यातील सर्वोच्च पद प्रदीर्घ काळ समर्थपणे भूषविल्याचा इतिहास जगाच्या पाठीवर फक्त भारत देशामध्ये घडला... हा इतिहास घडविणारी वीरंगणा म्हणजे भारतरत्न प्रियदर्शनी इंदिरा गांधी होय.

अलाहाबादमधील ऐश्वर्यसंपन्न नेहरू घराण्यात १९ नोव्हेंबर १९१७ रोजीइंदिराजींचा जन्म झाला. नेहरू घराणे स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय असल्याने राष्ट्रभक्तीचे संस्कार त्यांना घरातूनच मिळाले. वडील पंडित नेहरूंच्या सहवासातून इंदिराजींना राजकारणाचे बाळकडू प्राप्त झाले. शालेय जीवनापासूनच त्या स्वातंत्र्यआंदोलनात सहभाग घेऊ लागल्या. स्वातंत्र्याच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी आपल्या बालमित्रांमधून इंदिराजींनी वानरसेना उभी केली होती. वयाच्या २१ व्या वर्षी त्या काँग्रेसच्या सदस्य बनल्या. त्यांचा विवाह १९४२ मध्ये फिरोज गांधी यांच्याशी झाला.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले. याच काळात इंदिरा गांधी आपल्या वडिलांसोबत देश-विदेशात फिरल्या.नेहरूजींच्या उमद्या नेतृत्वाच्या छायेखाली इंदिराजींचे राजकीय व्यक्तिमत्त्व विकसित झाले. १९५९ साली त्या काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या. लालबहाद्दूर शास्त्रींच्या मंत्रिमंडळात त्यांनी नभोवाणी मंत्री म्हणून काम पाहिले.

              १९६६ साली इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि देशाला एक तेजस्वी नेतृत्व लाभले. नेहरूंची मूलभूत धोरणे त्यांनी पुढे राबवली. 'गरिबी हटाव' हा उल्लेखनीय प्रयत्न केला. २० कलमी कार्यक्रमाची नवाभिमुख योजना देशाला बहाल केली. शेतकरी, कष्टकरी, गरीब, यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेती, उद्योग व शास्त्र यांच्या विकासाला अग्रक्रम दिला. त्यांच्याच काळात देशात हरित क्रांती घडून आली. तसेच विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रातही देशाने प्रगती केली. पृथ्वी, अग्नि यासारख्या क्षेपणास्त्रांची निर्मिती झाली. मानवी विकास साधत असताना

निसर्गाचे संतुलनही टिकून राहिले पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी जागतिक पर्यावरण परिषदेत मांडली. कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून १९८३ चा युनी लोकसंख्या पुरस्कार त्यांना देण्यात आला.

               १९७१ मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. इंदिराजींच्या प्रेरणेने भारतीय सैनिकांनी दोनच दिवसांत पाकिस्तानचा दारुण पराभव केला. बांगलादेशाच्या निर्मितीचे श्रेयदेखील इंदिराजींकडेच जाते.

पक्षीय राजकारण, पाकिस्तानचे आक्रमण, पंजाबमधील शिखांचा

आतंकवाद, निर्वासितांचा प्रश्न अशा अनेक संकटांशी सामना करत त्यांनी देशाच्या प्रगतीची घोडदौड अखंड चालू ठेवली.३१  ऑक्टोबर १९८४ चा दिवस भारतासाठी जणू दुर्दैव घेऊनच उगवला.सकाळी नऊच्या सुमारास इंदिराजींच्या अंगरक्षकानेच त्यांच्यावर गोळीबार केला. रक्षकच भक्षक झाला आणि जागतिक किर्तीचं महान नेतृत्व शरीराची चाळण होऊन धरणीवर विसावलं. साऱ्या देशाला प्रकाशमान करणारी प्रियदर्शनी जीवनज्योत अनंतात विलीन झाली.

जब तक सूरज चाँद रहेगा...

तब तक इंदिरा गांधी

तुम्हारा नाम रहेगा..



No comments:

Post a Comment