Sunday, October 9, 2022

वाचन प्रेरणा दिन Importance of Reading

 









वाचन प्रेरणा दिवस मानवी जीवनात वाचनाचे महत्व

ग्रंथ आमुचे साथी ,

ग्रंथ आमुच्या हाती ,

ग्रंथ उजळती

अज्ञानाच्या ...अंधाराच्या राती  l

या ग्रंथांच्या तेजामधुनी

 जन्मा येते क्रांती ,

ग्रंथ शिकविती माणुसकी

अन  ग्रंथ शिकविती शांती 

निराश जीवा धीर धरुनी

 पुढे घेऊनी जाती  .

ग्रंथ आमुचे साथी ,ग्रंथ आमुच्या हाती ,

ग्रंथ उजळती

अज्ञानाच्या ...अंधाराच्या राती .

                   वाचन हे एक ज्ञानार्जनाचे साधन आहे .वाचन संस्कार आणि संस्कृतीसंवर्धनाचा महत्वपूर्ण उपाय आहे .वाचन हा मने घडविणारा सुसंस्कार आहे .निर्मळ आनंद देणारा आनंदयोग आहे .वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे    .

                  माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बालकांपासून ते आजोबांपर्यंत सगळीच माणसे दूरदर्शन ,मोबाईल भोवती केंद्रित झालेली दिसतात .तास न तास टी .व्ही .समोर बसणारी माणसं , स्वतःसाठी दररोज चार ओळी वाचायलाही तयार नाहीत .परिणामी संस्कृती अधःपतनास सुरुवात झाली . आणि मग पुन्हा सांगण्याची वेळ आली, “वाचाल तर वाचाल!


                                  मित्रहो वाचन हा फक्त विरंगुळा नाही तर अर्थपूर्ण विरंगुळा आहे . कारण मनोरंजनाबरोबरच ज्ञानार्जनाचा प्रमुख हेतू वाचनामागे असतो . आपण खरं तर वेळ जात नाही म्हणून वाचन करण्यापेक्षा वाचनासाठी वेळ काढला पाहिजे .वाचन लहानपणी ज्ञान देण्याचं काम करतं .तारुण्यात शील रक्षणासाठी विवेक आणि सद्भावना निर्माण करण्याचं काम करतं आणि वार्धक्याच्या काळात दुखः हरण करून आनंद देण्याचं काम करतं .

                  बालपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंत म्हणजेच संपूर्ण जीवनात मानवाला साथ देण्याचे आणि संकटातून वाचवण्याचे काम वाचन करते .ज्येष्ठ साहित्यिक वि .स .खांडेकर म्हणतात ,वाचनाने माझ्या जीवनातील आनंदाच्या क्षणांमध्ये अधिकच सुगंध भरला आणि दुःखाच्या वेळी संकटाशी लढण्याचे सामर्थ्य वाचनानेच दिले .वाचानासाठी आपल्याकडे भरपूर साहित्य उपलब्ध आहे .कथा , कादंबरी ,ललितगद्य ,काव्य ,महाकाव्य ,ग्रंथ इ .

वाङ्मयचा डोंगरच आपणासमोर उभा आहे .कमी आहे ती फक्त वाचणाऱ्यांचीच आणि म्हणूनच वाचन संस्कृती मरते आहे .असे म्हणण्याची वेळ आली आहे .अगदी विद्यार्थीदेखील पाठ्यपुस्तके संदर्भ पुस्तके वाचण्यास तयार नाहीत .

अभ्यासाला वेळ नाही ,

शॉर्टकटचा काळ आहे  l

पुस्तके बाजारात मिळत नाहीत ,

गाईड्सचा सुकाळ आहे 

प्रार्थना ,पसायदान पाठ नाही ,

आणि सिनेमाची गाणी

मात्र सारी तोंडपाठ आहेत l 

                           एक प्रख्यात तत्वज्ञ अनंत देसाई वृद्धापकाळात पुस्तक उचलत नाही म्हणून पुस्तकाची पाने फाडून ती हातात धरून वाचत असत .तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वयाच्या ९० व्या वर्षीही वाचन केल्याशिवाय झोपत नसत .अशा प्रकारे वाचनाच्या तपश्चर्येमुळे ही माणसं विद्वान आणि अजरामर झाली . 

                                  आज जे साक्षर आहेत ,ज्यांना चांगले वाचता येते असे लोक वाचनाकडे दुर्लक्ष करत आहेत .आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांच्या मनात निरक्षर असल्याची उणीव भासत आहे .म्हणूनच वाचन संस्कृती जपायची असेल तर ,वाचकांचा वर्ग वाढला पाहिजे .तसेच संपूर्ण साक्षरता निर्माण करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटसारख्या आधुनिक साधनावर प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे .याचा उपयोग वाचकांनी केला पाहिजे . आज प्रत्येक घरात देवघर आहे तसेच ग्रंथघर ही असायलाच पाहिजे .प्रत्येक गावात मोबाईल टॉवर नसला तरी चालेल पण प्रत्येक गावात एक ग्रंथालय आणि प्रत्येक हातात मोबाईल ऐवजी एक पुस्तक असलेच पाहिजे .कारण मोबाईल आणि टॉवरमुळे अप्रत्यक्ष संपर्क साधता येईल .पण संस्कृती विसरून दूर गेलेल्या मनांना एकत्र आणण्याचे काम ग्रंथालय ,त्यातील पुस्तके आणि त्यामार्फत होणाऱ्या संस्कारामार्फतच शक्य होईल .

शेवटी एवढेच म्हणेन ,

A room without books is a body without soul.

जय हिन्द ! 

Related Posts  - 

वाचन प्रेरणा दिवस मराठी भाषण 




No comments:

Post a Comment