Sunday, November 20, 2022

Mahatma Jotiba Fule महात्मा जोतीबा फुले यांचे कार्य

 


विद्येविना मती गेली,

मतीविना निती गेली,

नितीविना गती गेली,

गतीविना वित्त गेले,

वित्ताविना शुद्र खचले,

इतके  अनर्थ एका, 

 अविद्येने केले ।।

                                     हे संपूर्ण समाजातल्या तळागाळातल्या लोकांना ज्यांनी पटवून सांगितले,त्या महापुरुषाचे नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सासवडजवळ एका खेडेगावात १८ एप्रिल १८२७ रोजी झाला.मूळ गोरे आडनाव असणारे फुले कुटुंबीय आपल्या फुलांच्या व्यवसायामुळे हे कुटुंब फुले या आडनावाने ओळखू लागले.

                                   लहानपणापासून बंडखोर वृत्तीचे असणारे ज्योतिबा त्यांच्या कर्तृत्वातून आपल्याला पाहावयास मिळतात.शिक्षण हे साध्य नसून ते परिवर्तनाचे एक साधन आहे, हे महात्मा फुलेंनी ओळखले होते.महात्मा फुलेंनी अशिक्षित मागास समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे महात्मा फुलेंनी जाणलं.ज्याठिकाणी माणसाला पशुत्वाची वागणूक मिळत होती ,त्या मनुष्याच्या घरापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम केलं तर तो माणूस स्वाभिमानानं जगू शकतो.हे महात्मा फुलेंनी जाणले होते.शिक्षण हे फक्त विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती.अस्पृश्यांनी शिक्षणाचा उल्लेख करणं म्हणजे पाप मानलं जात होतं.अशा कालखंडामध्ये महात्मा फुलेंनी एक क्रांतिकारी विचार आणला व १८३६ साली शाळेची सुरुवात केली.

                                  महात्मा फुलेंनी १८४८ मध्ये पुण्यातल्या भिडेवाडा या ठिकाणी पहिल्यांदा मुलींची शाळा सुरु केली.या कामासाठी त्यांच्या पत्नींनी त्यांना मदत केली .निरक्षर असणाऱ्या पत्नीस पहिल्यांदा साक्षर केल.आपल्या पत्नीस त्या शाळेची शिक्षिका केले.काही कर्मठ सनातनी विचारांच्या लोकांनी त्यांना विरोध केला.त्यांच्या    पत्नीच्या अंगावरती दगड,गोट्यांचा मारा केला.तो त्यांनी सहन केला.त्यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले.मुलींची पहिली शाळा १ जानेवारी १८४८ला सुरु केली.जी शाळा महाराष्ट्रातील एकमेव शाळा असेल की ज्या शाळेमध्ये वेगवेगळ्या जाती-धर्मातील मुलींना प्रवेश देण्यात आला.सर्व जातीयता नष्ट व्हावी,समता प्रस्थापित व्हावी,वंचितांचा विकास व्हावा हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून या शाळेची सुरुवात केली.महात्मा फुलेंनी मुलींच्या शाळेबरोबरच १८५५ साली प्रौढांच्यासाठी रात्रशाळेची सुरुवात केली.१८६४ साली विधवा पुनर्विवाह याची सुरुवात केली.१८६३ रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची सुरुवात सावित्रीबाई फुलेंच्या मदतीने आपल्या घरामध्ये सुरु केली.समाज हा जातीबंधनात न अडकता तो सत्याच्या दिशेने यावा,एकसंध राहावा याच उदात्त दृष्टीकोणातून सत्यशोधक समाजाची स्थापना केली.महात्मा फुले हे नुसते समाजसुधारक नव्हते तर ते प्रसिद्ध वक्ते, प्रसिद्ध शाहीर,लेखक,कवी म्हणून त्यांच्या वाङ्मयातून पाहावयास मिळतात.'शेतकऱ्यांचा आसूड' या ग्रंथातून शेतकऱ्याविषयी असणरा अभ्यास या ग्रंथातून पाहायला मिळतो.त्यांच्या पोवाड्यातून छत्रपति शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम पाहावयास मिळते.शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थाने जयंती साजरी करणारा पहिला महापुरुष कोण असेल तर ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले.

                                  विचारातून परिवर्तन करणारे महात्मा फुले पाहावयास मिळतात.महात्मा फुलेंचे कार्य पाहून काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.पण हल्लेखोरांना जेव्हा महात्मा फुले हे खरंच परिवर्तनाचे शिलेदार आहेत.खरेखुरे समाजसुधारक आहेत हे जेव्हा  मारायला आलेल्या लोकांना कळाले तेव्हा मारेकऱ्यांनी हातातली शास्त्रे टाकून दिली .'जोतीबा आम्हाला माफ करा,आमचं चुकलं,आजपासून आम्ही तुम्ह्या चळवळीचा झेंडा खांद्यावरती घेऊ' अशी शपथ त्या लोकांनी घेतली.त्यांच्याच हातात जोतिबांनी लेखणी देण्याचे कार्य केले.

                              महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची दाखल ब्रिटीशांनासुद्धा घ्यावी लागली .फुले दांपत्याचे कार्य पाहून या दांपत्याचा पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर जाहीर सत्कार केला.महात्मा फुलेंनी सतीप्रथा बंद पाडण्यासाठी ब्रिटीशांची मदत घेतली.सतीची पद्धत बंद केली.समाजामध्ये एक आदर्श व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला.

                        या उक्तीप्रमाणे स्वतःच्या दत्तक मुलाचा विवाह सत्यशोधक पद्धतीने  केला व आचरणात आणण्याचा प्रयत्न केला.समाजसुधारणेचे कार्य अखंडपणे करत असताना अशा या महान पुरुषाचे २८ नोव्हेंबर १८९० रोजी दुःखद निधन झाले.महापुरुषाच्या निधनानंतर संपूर्ण देश हळहळत होता.

                           गुलामगिरीविरुद्ध बंड करणर,शिक्षणाचा ध्यास धरून उपेक्षितांचा विकास करणरा ,जातीय विषमतेविरुद्ध प्रखर लढा देणारा,सत्याचा शोध घेऊन संशोधन करणारा ,अस्पृश्यांसाठी शाळा सुरु करणारा ,अशिक्षित ,अज्ञानी लोकांना संघटीत करून त्यांच्या मनामध्ये जागृती करणारा ,मानवी हक्काचं समर्थन करणारा ,नीतीमूल्यांचं पालन करणारा एक समाजसुधारक म्हणून आपल्याला पाहावयास मिळतात.

No comments:

Post a Comment