Thursday, January 19, 2023

Names of birds and animals and their living places

Tiger - Cave / Den

Hyena - Cave / Den

Cock - Coop

Bull, Ox - Cattle / Shade

Cow - Shade

Dog - Kennel

Dear - Grasslands

Pig - Sty

Eagle - Eyrie

Goat - Ship - Pen

Owl - Tree /Barn

Pigeon - Cote

Spider - Web

Wolf - Cave/ Den

Lion - Cave / Den

Hen - Coop

Bee - Hive

Camel - Desert

Crow - Nest

Dove - Cote

Donkey - Stable

Duck - Water

Fox - Jungle

Horse - Stable

Snail - Shell

Sparrow - Nest

Tiger- Lair

Bear - Cave/Den

Raccoon - Cave / Den

Pig - Sty

Bird - Nest

Man - House

Mouse - Hole

Parrot - Cage

Rabbit - Burrow

Snake - Hole

Ship - Pen

Monkey - Trees

Squirrel - Drey

Zebra - Zoo





Sunday, January 15, 2023

'माझी आई 'मराठी भाषण / निबंध





"स्वामी तिन्ही जगाचा,

आईविना भिकारी"

       सुवासिकता,सुंदरता आणि सु कोमलता या गुणांनी गुलाबाला मनोवेधकता प्राप्त होते.ध्रुवाची निश्चलता, निर्धारितता आणि नेत्रदीपकता त्याला अढळ स्थान मिळवून देत असते. गंगेचे पावित्र्य, परंपरा व परोपकारिता तिच्या पदरी पुण्याई बांधीत असते. आईचेही अगदी तसेच आहे.

 "आई तुझी माया आभाळाएवढी, तुझ्या ममतेत पंच अमृताची गोडी."

 आईविना मन छिन्न आहे, जीवन सुन्न आहे आणि गजांत लक्ष्मी असलेले वैभव देखील शून्य आहे. म्हणूनच कवी यशवंत म्हणतात... "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी".

 आई एक विद्यापीठ आहे. सत्ता, मत्ता, विद्वत्ता हे सारे या जन्मदेपुढे कनिष्ठ आहेत.म्हणून तर जगतज्जेत्या सिकंदरालाही मातेची ओढ लागली होती. कुणापुढेही न वाकलेला,न झुकलेला व जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा असणारा सिकंदर आई पुढे नतमस्तक झाला होता. हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे शिवाजी महाराजांच्या जीवनात आईला सर्वश्रेष्ठ स्थान आहे.

 आई मुलाला जन्म देते.सर्वस्वी परावलंबी असणाऱ्या बाळाला नयनांचा दिवा आणि हाताचा पाळणा करून वाढवते. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करते. चार घर हिंडून भाकर तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण सुद्धा स्वतः उपाशी राहते व आपल्या लेकराला ओला-कोरडा घास भरवते. आई आपल्या बाळासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावते,हे आपल्याला इतिहासातील हिरकणीने दाखवून दिले आहे. कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून निर्जीव मूर्ती घडवतो. पण आई मात्र जिवंत गोळ्याला आकार देऊन त्याच्या कोऱ्या पाठीसारख्या संवेदनशील मनावर सुसंस्कार करते.म्हणूनच महात्मा गांधीजी म्हणत की,'एक माता शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे.' आईचा प्रेमभाव सर्वत्र सारखाच असतो. त्यात गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ- कनिष्ठ असा भेदभाव नसतो. मातेच्या प्रेमात दिक्कालाच्या अडचणी नसतात.आईच्या महतीचे वर्णन इंद्रदेवही करू शकत नाही.

 "शब्द शोधण्यास निरोप स्वर्गात धाडले,

नाही सापडत म्हणून देवेंद्रानेही कर जोडले."

 मातेमुळे आपणास विश्वाचे दर्शन घडते.तिच्याशिवाय या जगात माझे, आपले म्हणावे असे कोणीच नाही.आईचे हृदय सागरासारखे विशाल असते. आपल्या चिमण्या पाखरांसाठी ती अपार कष्ट घेते आणि आपल्या बाळांच्या मधून एक संस्कारक्षम पिढी निर्माण करते.

      जगाच्या पाठीवर एकच न्यायाचे महान मंदिर आहे ते म्हणजे आई. जेथे मुलाचे सर्व दुर्गुण माफ होतात. म्हणूनच 'आई' या दोन अक्षरी शब्दाने संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे. आईसारखे दुसरे दैवत नाही. म्हणून कुंतीपुत्र कर्णाला राधेने आपलेसे केले.देवकी पुत्र श्रीकृष्णाला यशोदेने ममता दिली व आपल्या देवत्वाची प्रचिती आणून दिली.

 आई खरंच काय असते याचे यथार्थ वर्णन करताना कवी फ. मु. शिंदे म्हणतात...

 "आई खरंच काय असते?

 लेकराची माय असते,

 वासराची गाय असते,

दुधाची साय असते,

 लंगड्याचा पाय असते.

आई असते जन्माची शिदोरी

सरतही नाही अन उरत ही नाही.

 शेवटी मी एवढेच म्हणेन....

 "रक्ताच्या नात्यापेक्षा दुधाचे नातं महान असतं.

म्हणून आई या शब्दापुढे सारं जग लहान असतं!"

धन्यवाद!




Thursday, January 12, 2023

मकर संक्रांत सणाविषयी मराठी माहिती / निबंध




 मकर संक्रांत

या सणाविषयी मराठी निबंध / मराठी माहिती


     'तिळगुळ घ्या, गोड बोला' असे म्हणून एकमेकांच्यातील भांडण, कटूता विसरण्याचा सण म्हणजे,मित्रांनो, तुमच्या लक्षात आलेच असेल. होय, तो सण म्हणजे 'मकर संक्रांत'. इंग्रजी वर्षाप्रमाणे जानेवारी महिना म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. याच महिन्यात येणारा हा सण. सूर्य या दिवशी मकरवृत्तात प्रवेश करतो. म्हणून या सणाला 'मकर संक्रांत' हे नाव पडले. आर्यांच्या काळापासून म्हणजेच प्राचीन काळापासून हा सण साजरा केला जात आहे.

      प्रत्येक सणामागे काही ना काही पौराणिक कथा असतातच. तशीच या सणाबाबतही कथा सांगितली जाते. संक्रांती नावाची देवी होती. तिने या दिवशी शंकासुराचा वध केला.ही देवी लांब ओठ, मोठे नाक,नऊ हात असलेली. ही देवी प्रसन्न नाही की, मंगलदायक नाही. तिचे वाहन, वस्त्र व अलंकार वेगवेगळे असतात.या वस्त्र व अलंकारांच्या माध्यमातून ती पुढे येणारे संकट सुचवत असते.ती ज्या दिशेने येते त्या ठिकाणी समृद्धी येते आणि ती जिकडे  जाते तिकडे संकट कोसळते. यावरून 'संकट येणे' या अर्थाने 'संक्रांत येणे' हा वाक्प्रचार रूढ झाला आहे.

   या सणानिमित्त तिळगुळ देण्याची पद्धत आहे. काळी वस्त्रे  घालण्याची प्रथा आहे. यामागे विज्ञान दडलेले आहे.हा सण येतो थंडीच्या दिवसात.त्यामुळे शरीराला स्निग्ध व उष्ण पदार्थांची गरज असते.म्हणून तिळगुळ खाण्याची पद्धत आहे.काळे वस्त्र थंडीपासून रक्षण करते म्हणून काळे वस्त्र शुभ मानले आहे.

         या सणाच्या निमित्ताने आपण आपली संस्कृती जपत असतो. सुवासिनी सुगडात बोरे, हरभरा,ऊस,गहू घालून वाणवसा करतात. हळदीकुंकू समारंभ साजरा करून काहीतरी वस्तू भेट देतात.लहान मुलांचे बोरनहान करतात. या साऱ्या निमित्ताने लोक एकत्र येतात.

        दक्षिण भारतात या सणाला 'पोंगल' म्हणतात.आपण संक्रातीच्या आदल्या दिवसाला 'भोगी' म्हणतो. त्या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी, लेकुरवाळी भाजी, कढी,मुगाच्या डाळीची खिचडी असा मस्त बेत करतो. संक्रातीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. हा दिवस अशुभ मानतात.

     तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या पूर्वजांनी खूप विचार करूनच या सर्व सणांची योजना केली आहे. म्हणून सण साजरा करताना जाणून घ्या आपल्या सणांचे महत्त्व.

Tuesday, January 10, 2023

प्रेम द्यावे व प्रेम घ्यावे संस्कार कथा




 संस्कार कथा

 प्रेम द्यावे व प्रेम घ्यावे 

              महात्मा बुद्ध लोकांना उपदेश करण्यासाठी गावोगावी जात असत. एके दिवशी ते एका गावात गेले. तेथील बहुतेक सर्वच लोक भांडखोर आणि व्यसनी होते. तेथे जागोजागी दारूचे आणि जुगाराचे अड्डे होते. बुद्धांनी त्या गावात जाऊन लोकांना उपदेश करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, " बंधूंनो वाईटाला वाईटाने उत्तर देऊ नका. त्याने काहीही साध्य होत नाही. एखादा  दुष्टपणाने वागत असेल तरी तुम्ही त्याच्याशी दुष्टपणा करू नका. कारण चिखलाने  चिखल धुतला  जात नाही. जो तुमच्याशी वाईट वागतो,त्याचेही तुम्ही भले करा. जशास तसे न वागता त्याचाही आदर करा. तेव्हाच तो मनुष्य सुधारू शकेल. "

    लोकांमध्ये बसलेला एक गुंड प्रवृत्तीचा मनुष्य बुद्धांचे भाषण ऐकत होता.त्यांचे बोलणे संपतात तो तावातवाने बोलू लागला, "अरे पाखंड्या, तू येथे कशासाठी आला आहेस? तुझी व्यर्थ बडबड ऐकायला आम्हाला वेळ नाही."  तेव्हा बुद्ध शांतपणे म्हणाले, " तुला आणखी काही सांगायचे आहे काय? "  तेव्हा उत्तरादाखल तो अधम त्यांच्यावर थुंकला. पण बुद्ध शांतच राहिले. त्यांनी वस्त्राने आपला चेहरा पुसला व पुन्हा म्हणाले, "  तुला आणखी काही सांगायचे आहे काय? " तेव्हा तो मनुष्य म्हणाला, " तू ढोंगी, मतलबी, कावेबाज आणि खोटारडा आहेस. " तेवढ्यात दुसरा मनुष्य उभा राहिला आणि त्वेषाने म्हणाला,  " लोकांनो पाहता काय? याला मारा.हा महात्मा बुद्धांना अपशब्द बोलत आहे."

   तेव्हा महात्मा बुद्धांनी त्याला शांत केले व म्हणाले, "तू याच्यावर रागावू नकोस.कोणी आपल्याला शिवी जरी दिली तरी आपण प्रत्युत्तर देऊ नये."  नंतर ते त्या गुंडाला उद्देशून म्हणाले, "मी तुझे म्हणणे  ऐकले. आता मलाही काही सांगायचे आहे. समज तुझ्याकडे एक भाकरी आहे आणि तुला ती मला द्यायची आहे.पण मी ती घेतलीच नाही तर ती कोणाकडे राहील? " तो मनुष्य म्हणाला,"त्यात काय विशेष? ती माझ्याकडेच राहील. बुद्ध म्हणाले, " बरोबर बोललास!आतापर्यंत तू मला जेवढ्या शिव्या दिल्यास,त्या मी घेतल्याच नाहीत.म्हणून त्या तुझ्याकडेच राहिल्या आहेत. " ते ऐकून तो मनुष्य सर्दच झाला.

 दुसऱ्या दिवशी तो मनुष्य महात्मा बुद्धांना भेटण्यासाठी दुसऱ्या गावी गेला व त्यांचे पाय धरून म्हणाला, " हे महात्मन,काल मी आपला अपमान केला. त्याबद्दल मला क्षमा करा.आपण थोर आहात. " तेव्हा बुद्ध म्हणाले, "अरे अजून तू कालचा विचार करीत आहेस?  विसरून जा ते सगळे.

'प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे'  हाच खरा धर्म आहे.




Sunday, January 8, 2023

English Proverbs with Marathi meaning

In this post, we are going to learn some important English proverbs and their Marathi meaning.

-----------------------------------

Let's learn some important english proverbs with their marathi meaning.

-----------------------------

Action speak louder than wordplay

उक्तीपेक्षा  कृती श्रेष्ठ.

A bad workman quarrels with his tools.

नाचता येईना अंगण वाकडे.

The bird in hand is what two in the bush.

हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये.

Drowning man catches at a straw.

बुडत्याला काडीचा आधार.

A friend in need is a friend indeed.

गरजेला हात देतो तोच खरा मित्र.

A penny saved is a penny gained.

वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा.

A rolling Stone gathers no moss.

अस्थिर मनुष्य यशस्वी होत नाही.

A stitch  in time saves nine.

वेळीच केलेल्या उपायाने संभाव्य मोठी हानी टळते.

A word is enough for the wise.

शहाण्याला शब्दाचा मार.

All is fair in love and war.

प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असते.

All is well that ends well.

ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड.

All that glitters is not gold.

जे चकाकते ते सर्व सोनेच नसते.

All work and no play makes jack a dull boy.

योग्य विश्रांती वाचून सतत काम केल्यास काम करणारा व त्याचे काम या दोघांचेही नुकसान होते.

An apple a day keeps the doctor away.

दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा.

An empty vessel makes much noise.

उथळ पाण्याला खळखळाट फार.

Barking dogs seldom bite.

भुंकणारी कुत्रे चावत नसतात.

Beggars cannot be choosers.

भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी का?

Better late than never.

कधीही न करण्यापेक्षा उशिरा का होईना करणे श्रेयस्कर. 

Birds of feather flock together.

एकाच माळेचे मणी.

Blood is thicker than water.

कातड्यापेक्षा आतड्याची ओढ अधिक असते.

Bones for latecomers.

हाजीर तो वजीर.

Charity begins at home.

औदार्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करावी.

Contentment is happiness.

संतोष हेच परमसुख.

Cut your coat according to your cloth .

अंथरूण पाहून पाय पसरावेत.

Don't count your chickens before they are hatched.

बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी.

Don't cross a bridge until you come to it.

संकटे येण्यापूर्वीच त्यांची चिंता करीत बसू नका.

Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy and wise.

लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य,संपत्ती भेटे.

Every cloud has a silver lining.

संकटांच्या सागराला सुखाचा किनारा असतोच.

 किंवा

प्रत्येक काळया ढगाला सोनेरी किनार असते.

Every dog has its day.

चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.

Every house has its skeleton.

घरोघरी मातीच्या चुली.

Example is better than precept.

प्रत्यक्ष कृती ही केवळ उक्तीपेक्षा श्रेयस्कर होय.

Experience is the best teacher.

अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु होय.

Familiarity breeds contempt.

अतिपरिचयात अवज्ञा.

First Come First served.

हाजीर तो वजीर.

Fortune favours the Brave.

साहसे श्री: प्रतिवसति. 

God helps those who helps themselves.

जे स्वतः कष्ट करतात, त्यांना परमेश्वर सहाय्य करतो.

Half loaf is better than none.

उपास घडण्यापेक्षा अर्धी भाकरी बरी.

Health is wealth.

आरोग्य हीच संपत्ती.

Honesty is the best policy.

प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण.

It is never too late to mend.

उशीर झाला तरी सुधारणा करणे चांगले.

It is no use crying over spilt milk.

गतकाळाचा शोध फुकाचा.

It never rain but it pours.

संकटे ही एकटीदुकटी  येत नसतात.

It takes two  to make a quarrel.

टाळी एका हाताने वाजत नाही.

Laugh and grow fat.

हसा आणि लठ्ठ व्हा.

Listen to people but obey your conscience.

ऐकावे जनाचे करावे मनाचे.

Little things please little minds.

कोल्हा काकडीला राजी.

Look before you leap.

पूर्ण विचार केल्याशिवाय कृती करू नका.

Make hey while the sun shines.

तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्या.

Man proposes  God disposes.

मनुष्य योजतो एक, देवाच्या मनात असते निराळेच.

Many hands make light work.

अनेकांच्या सहकार्याने काम सोपे बनते.

Might is right.

बळी तो कान पिळी.

Money bigets money. 

पैशापाशी पैसा जातो.

Money makes the mare go.

दाम करी काम.

More haste less speed.

फार घाई कमी वेग.

Necessity is the mother of invention.

गरज ही शोधाची जननी आहे.

No pains no gains.

कष्टाशिवाय फळ नाही.

No rose without thorn.

काट्या वाचून गुलाब नाही.

No smoke without fire.

विस्तवाशिवाय धूर नाही.

One good turn deserves another.

उपकाराची फेड उपकारानेच करावी.

One swallow does not make a summer.

एखाद्या उदाहरणावरून नियम सिद्ध होत नाही.

Out of site out of mind.

दृष्टिआड सृष्टी.

Out of the frying pan, into the fire.

आगीतून फुफाट्यात.

Penny wise pound foolish.

बारीकसारीक बाबतीत काटकसर, मोठ्या बाबतीत उधळ्या.

Practice makes perfect.

सरावाने पूर्णत्व येते.

Prevention is better than cure.

उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला.

Reap as you sow.

पेरावे तसे उगवते./ करावे तसे भरावे.

Rome was not built in a day.

महत्त्वाची कार्यें तडकाफडकी होत नसतात. 

Set a thief to catch a thief.

चोराच्या वाटा चोरालाच माहीत.

Slow and steady wins the race.

सावकाश आणि सातत्याने काम केल्यास यश मिळते.

Spare the rod and spoil the child.

छडी लागे छम छम,विद्या येई घमघम.

Strike while the iron is hot.

तवा तापलेला आहे तोवर पोळी भाजून घ्या.

The child is father of the man.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.

The wearer knows where the shoe pinches.

ज्याचे जळते त्यालाच कळते.

Tit for tat.

जशास तसे.

To err is human.

चुकणे हा मनुष्यधर्म आहे.

Too many cooks spoil the broth.

पाच-पन्नास आचारी,वरणामध्ये मीठ भारी.

Truth will be out.

सत्याला वाचा फुटतेच.

Two hands are better than one.

एक से दो भले.

Union is strength.

एकी हेच बळ./ ऐक्य हेच सामर्थ्य.

When the cats away the mice will play.

मांजरीच्या अनुपस्थितीत उंदीर बिनधास्त खेळतात.


 

Thursday, January 5, 2023

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी उपयुक्त वाक्प्रचार व त्यांचे अर्थ.  आपल्याला ही माहिती नक्की आवडेल.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :-

परवानगी मिळणे - मोकळीक मिळणे, सवलत मिळणे.

शाळा बुडवणे - शाळेला दांडी मारणे.

नवल वाटणे - आश्चर्य वाटणे.

खोडी उलटणे - आपण केलेली खोडी अंगाशी येणे.

बदला घेणे - वचपा काढणे.

निर्धार करणे - ठाम निश्चय करणे.

भूमिगत होणे - लपून राहणे.

अटक करणे - कैद करणे.

बाळकडू मिळणे - लहानपणापासून संस्कार होणे.

प्रभाव असणे - ठसा असणे, छाप पडणे.

सुगावा लागणे - माग मिळणे, पत्ता कळणे.

पाळत ठेवणे -मुद्दाम नजर ठेवणे.

दीक्षा मिळणे - संस्कार मिळणे.

अवगत होणे - माहित होणे.

सहभाग घेणे - सामील होणे.

स्थापन करणे - निर्माण करणे, स्थायी स्वरूप देणे.

धमाकावणे -धमकी देणे.

प्रोत्साहित करणे - उत्तेजन देणे.

अवलंब करणे - अंगीकारणे, स्वीकारणे.

प्रत्यय येणे - अनुभवास येणे.

प्रणांची आहुती देणे - बलिदान करणे.

अजरामर होणे - कायम स्मरणात राहणे.

अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे.

कपाळाला आठ्या घालणे - नाराजी व्यक्त करणे.

चेहरा कसनुसा होणे -अपराधी भावना होणे.

नजर चुकवणे -डोळ्याला डोळा न देणे,शरम वाटणे.

पोटात खड्डा पडणे - भीती वाटणे.

पाय लटलटू लागणे -घाबरून पाय थरथरणे.

पोटात बकबुक होणे - खूप घाबरणे.

कबूल करणे - मान्य करणे.

जीव भांड्यात पडणे - दिलासा मिळणे.

चलबिचल होणे - जीवाची घालमेल होणे.

डोक्यावरून हात फिरवणे - माया करणे.

ठणकावून सांगणे - ठामपणे सांगणे.

ऐपत नसणे - कुवत नसणे.

ढसाढसा रडणे - खूप रडणे.

धूम ठोकणे - जोराने पळणे.

भरून येणे - गहिवरणे.

चकित करणे - आश्चर्य वाटायला लागणे.

पाठलाग करणे - पाठोपाठ जाणे.

 देहभान विसरणे - स्वतःची जाणीव विसरणे,गुंग होणे.

शोध घेणे - ओळखणे.

काळजी वाटणे - खंत वाटणे.

बाद करणे - आऊट करणे.

घामाघुम होणे -  खूप घाम येणे.

पाठ थोपटणे -  शाबासकी देणे.  

नावाचा जप चालणे - सारखी सारखी एखादी गोष्ट आठवणे.

धुडकावून लावणे - नकार देणे. 

मनावर ताबा मिळवणे - संयम बाळगणे.

गायब होणे -  नाहीसे होणे.

मन लालचावणे - एखादी गोष्ट हवीहवीशी वाटणे.

मन भरून येणे - भावना दाटून येणे.

पदर पसरणे - दुवा मागणे.

गायब होणे - अदृश्य होणे.

गौरव करणे - सन्मान करणे.

वावर असणे - हिंडणे-फिरणे.

खडानखडा माहिती असणे- संपूर्ण माहिती असणे.

संवर्धन करणे - काळजीपूर्वक वाढवणे.

झुंज देणे -  लढणे.

धाडस दाखवणे - हिम्मत दाखवणे.

मोलमजुरी करणे - कष्टाची कामे करून पैसे मिळवणे.

गाल फुगवणे - रुसून बसणे.

टिंगल करणे -  मस्करी करणे. खोडी करणे -चेष्टा करणे.

अर्ज करणे - विनंती करणे, विनवणी करणे.

छाती धडधडणे - जीव घाबरा घुबरा होणे.

गलबलून येणे - गहिवरणे,मन भरून येणे.

आग्रह करणे-  हट्ट धरणे.

खुशीत मान डोलावणे-  आनंदाने होकार देणे.

रस्ता पार करणे - रस्ता ओलांडणे.

डोळे टिपणे - अश्रू पुसणे.

कुतूहल वाटणे- उत्सुकता निर्माण होणे.

निरीक्षण करणे - नीट पाहणे.

अंगाला झोंबणे - अंगाला चुरचुरणे.

आधार देणे - आश्रय देणे, संरक्षण देणे.

फस्त करणे- सगळे खाऊन संपवणे.

रुंजी घालणे - गोल फेर धरणे.

फन्ना उडवणे - पदार्थ खाऊन लगेच संपवणे.

कानकीट्ट करणे - बोलून बोलून किंवा सततच्या एकाच आवाजाने कान किटवणे.

सुळकी मारणे - सूर मारणे, झेप घेणे.

निगा राखणे -  काळजी घेणे. 

मनमोहीत करणे - मन गुंग करणे.

पाळत ठेवणे - नीट लक्ष ठेवणे.

जोपासणे - निगा राखणे, काळजी घेणे.

कानोसा घेणे - कान देऊन लक्षपूर्वक ऐकणे,अंदाज घेणे.

भरारी घेणे - झेप घेणे.

प्रसार होणे - पळून जाणे.

उधळून देणे - विखरून टाकणे.

रस घेणे - विशेष आवड असणे.

असंतोष निर्माण होणे - प्रचंड नाराजी निर्माण होणे,चीड येणे.

संकल्प करणे - दृढनिश्चय करणे.

जेरीस आणणे - हैराण करणे.

टिकव लागणे - निभाव लागणे, टिकणे.

बंड पुकारणे - विरोधात उठाव करणे.

रवानगी करणे - पाठवणे.

वीरगती प्राप्त होणे - वीरमरण येणे.

अमर होणे -  नाव चिरकाल राहणे.

उरात धडधडणे - भीती वाटणे.

मंडळ धरणे - फेर धरणे.

 







Wednesday, January 4, 2023

6 जानेवारी - पत्रकार दिन




 6 जानेवारी -  पत्रकार दिन

" ना खीचो कमान को

  ना तलवार निकालो

  जब तोप मुकाबिल हो

  तो अखबार  निकालो  "

       6 जानेवारी हा 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो. समाजातील ज्वलंत प्रश्नावर सडेतोडपणे लिखाण करून समाजात जनजागृती करणारा दूत म्हणून वर्तमानपत्राकडे पाहिले जाते. आज पत्रकार दिन साजरा करत असताना त्या वृत्तपत्रांचा इतिहास सुद्धा पाहणे तितकेच गरजेचे आहे. दर्पण,केसरी, मराठा समाचार जागरण,बंगाल,केसरी, प्रबोधन यासारख्या वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये लोकांच्या मनामध्ये जागृती केली होती व यातूनच स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहू लागले.

     देशाची सेवा करण्यासाठी सीमेवरती सैनिकांची आवश्यकता असते तितकीच गरज देशातील अंतर्गत विभागाचे रक्षण करण्यासाठी उत्तम पत्रकाराची आवश्यकता असते. बाळशास्त्री जांभेकर यांच्या लेखमालेपासून ते नवाकाळच्या खाडीलकरापर्यंत सर्व समकालीन व्यक्तींनी वर्तमानपत्रातून लिखाण करून जनतेपर्यंत उत्तम संदेश पोहोचविण्याचे कार्य केले. पत्रकार दिन साजरा करत असताना आज चांगल्या,उज्वल भविष्य असणारे,जनतेच्या प्रश्नांचा ठाव घेणाऱ्या उत्तम पत्रकारांची निर्मिती होणे गरजेचे आहे.आज ही आम्हाला निर्भीडपणे लिखाण करणारी, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारी व उपेक्षित व वंचितांना मुख्य प्रवाहात आणणारे प्रामाणिक पत्रकार पहावयास मिळतात.

    उत्तम पत्रकार हा समाजाचा दिशादर्शक असतो.वास्तववादी चित्र आपल्या प्रकट लेखणीतून वस्तुस्थिती त्रयस्थपणे मांडण्याचे कार्य करतो. अशाच पत्रकारांची निर्मिती झाली तर यशाचे शिखर गाठता येईल व राष्ट्राच्या जडणघडणीस मदत होऊ शकते.

जय हिंद ! जय भारत !



Tuesday, January 3, 2023

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण





 युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज

 महाराष्ट्रातील विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाल्यापासून महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वातंत्र्यसूर्य उगवलाच नव्हता. महाराष्ट्राची भूमी 300 वर्षे गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडली होती. अशावेळी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून महाराष्ट्राच्या इतिहासात नवा अध्याय निर्माण केला.

      युगपुरुष शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. वडील शहाजीराजे यांच्याकडून शौर्याचा वारसा आणि माता जिजाबाईंकडून सुसंस्काराचा अलौकिक वसा शिवबांना लहानपणापासूनच मिळाला. जिजाबाईंनी शिवबांना लहानपणी रामायण महाभारतातील शिवरायांच्या कथा सांगितल्या. म्हणूनच स्वराज्याच्या रूपाने या भूमीवर शिवभारत घडले. आजच्या मातांनी आपल्या मुलांना हे शिवभारत सांगितले तर निश्चितच डॉक्टर कलामांच्या स्वप्नातील व्हिजन भारत साकार झाल्याशिवाय राहणार नाही.

      वयाच्या सोळाव्या वर्षी शिवबांनी रायरेश्वराच्या शिवाला साक्षी ठेवून आपल्या तरुण मित्रांच्या सोबतीने स्वराज्याची शपथ घेतली.अत्यंत कमी वयात शिवबांनी हे अग्नी दिव्य हाती घेण्याचे धाडस केले आणि ते पूर्णत्वास नेले. त्यासाठी त्यांनी पुणे, सुपे, मावळ यासारख्या प्रांतात स्वतः फिरून लोकांची परिस्थिती,त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि हळूहळू लोकांच्या मनामध्ये स्वधर्म आणि स्वराज्य याबद्दल आस्था निर्माण केली.एक कवी म्हणतो...

' माणसांना अस्मितेचे भान यावे लागते,

पाय चाटू श्वापदांनी इन्सान व्हावे लागते.'

या युक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील माणसांना स्वतःच्या अस्मितेचे भान करून देण्याचे काम शिवरायांनी केले. त्यामुळेच इथल्या माणसांना स्वराज्याचे महत्त्व पटले आणि त्यातूनच तानाजी मालुसरे,येसाजी कंक, बाजी पासलकर,नेताजी पालकर यांसारखी अनेक तरुण मंडळी शिवबांभोवती जमा झाली, आणि याच मावळ्यांनी पुढे स्वराज्याचा गोवर्धन स्वतःच्या हातावर पेलला.

      रणांगणावर योद्धा लढत नसतो,

 त्याचे हात किंवा हातातील समशेर ही लढत नसते,

लढत असते ते फक्त त्याचे मन,

 शिवरायांनी हीच लढणारी मनं घडविण्याचे महान कार्य केले. परकीयांशी लढण्या अगोदर त्यांनी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करून स्वराज्याची पायवाट मोकळी केली.

      अफजलखानाचा प्रतापगडावर वध करून स्वराज्यावरील पहिले मोठे संकट शिवरायांनी सहज धुळीस मिळवले.पन्हाळगडावरून केलेली सुटका आणि शाहिस्तेखानाची केलेली फटफजिती यातून शिवाजींनी स्वतःची आणि आपल्या सहकारी मावळ्यांची योजनाबद्धता काळालाही सिद्ध करून दाखवली.औरंगजेब बादशहाच्या कैदेतून अद्भुत सुटका करून घेऊन संपूर्ण भारत वर्षाला हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्याची प्रचिती आणून दिली. या आणि अशा अनेक संकटांशी सामना करत करत शिवरायांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व दैदिप्यमान बनत गेले.

      शिवरायांनी उभे केलेले स्वराज्य कुणा एकट्या दुकट्याचे नव्हते तर ते संपूर्ण रयतेचे होते. स्वराज्यात सर्व जाती-धर्मातील माणसांना स्थान होते.ब्राह्मण, भोळ्या समजुती आणि परंपरांचे मात्र तेथे उच्चाटन होते.आणि म्हणूनच ते स्वराज्य म्हणजे एक प्रकारचे समाज परिवर्तनच होते.

    समाज परिवर्तनाच्या पायावर उभे असलेले हे राज्य न्यायाचे, नीतीचे, जनतेच्या कल्याणाचे राज्य होते आणि असे राज्य उभे करणारे शिवछत्रपती हे रयतेचे राजे होते.

 धन्यवाद!

Monday, January 2, 2023

छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj apratim bhashan






 युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज

  श्रीपती, भूपती,नृपती,अधिपती, पृथ्वीपती, छत्रपती, कुलवंत, जयवंत,यशवंत,किर्तीवंत, धैर्यशील, सतशील, धर्मशील, प्रजादक्ष, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छत्रपती  शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा!

   नमस्कार, व्यासपीठावरील मान्यवर,व्यासपीठासमोरील तुम्ही सर्व सन्माननीय ज्ञाते, वक्ते आणि रसिक श्रोते हो! माझ्या भाषणाचा विषय लक्षात आला असेल. विषय मांडतोय 'युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज'.

 'झाले बहु, होतील बहु,

 परंतु यासम हा!'

 हे वर्णन ज्यांना अगदी तंतोतंत लागू पडते, ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज.आणि म्हणूनच रसिकहो... शेकडो वर्षे उलटून गेली तरी लोकांच्या मनातील महाराजांचे स्थान आढळ आहे. छत्रपती शिवाजी राजांचे 'राजा आणि व्यक्ती' म्हणून कर्तृत्व हे अतुलनीय होते. त्यांचे चरित्र अत्युच्च होते. म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाच्या तोफा कालशिलावर अखंड आहेत.म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात'

 "निश्चयाचा महामेरू

 बहुत जनासी आधारू

 अखंड स्थितीचा निर्धारू

 श्रीमंत योगी

धीर उदार सुंदर

 शूर प्रियसी तत्पर

सावधपणे नृपवर

तुच्छ केले

यशवंत किर्तीवंत सामर्थ्यवंत वरदवंत  पुण्यवंत नीतीवंत जाणता राजा

     शिवाजी महाराजांना हे जाणतेपण लाभले ते त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांच्यामुळेच.

    शिवरायांचा जन्म 1630 मध्ये झाला 1680 साली त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. म्हणजे अवघे 50 वर्षांचे आयुष्य. पण या अल्पकाळात राजांनी केलेली कामगिरी अपूर्व ठरणारी आहे.या यशाचे श्रेय या योगी पुरुषाच्या कर्तृत्वात आणि महान चारित्र्यात दडलेले आहे.

    शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजे भोसले व मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी या सुपुत्राचा जन्म झाला. मासाहेब जिजाऊंनी या आपल्या असामान्य पुत्राला आपल्या तेजस्वी विचारांचे बोधामृत पाजून परिपक्व केले. शिवाजी राजांचे आजोबा मालोजीराजे व पिता शहाजीराजे हे दोघेही शूर होते. त्यांच्या पराक्रमाचा वारसा शिवरायांना मिळाला.

    महाराजांना मराठा तितुका मिळवून महाराष्ट्र धर्म वाढवायचा होता आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची होती.हिंदूंच्या सार्वभौम स्वराज्याची अपेक्षा केली आणि '  हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे! '  या विचाराने प्रेरित होऊन हिंदवी राज्याच्या स्थापनेचा पाया त्यांनी घातला. हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ जाणतेपण.

 शिवाजी राजांनी महाराष्ट्रात प्रथम स्वराज्याचे बी रुजविण्यास प्रारंभ केला. स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांना अतोनात मेहनत करावी लागली आणि या सर्व घडामोडीत शिवरायांच्या वाट्याला दगदगीचे जीवन आले. पण राजांनी कधी माघार घेतली नाही. आदिलशाही निजाम यांच्याबरोबर काही वेळेला स्वकीयांचाही विरोध सहन करावा लागला. कधी शक्तीचा तर कधी युक्तीचा वापर करून त्यांनी आपले स्वराज्याचे स्वप्न साकार केले. महाराजांचे नाव ऐकताच शत्रूच्या गोटात भंबेरी उठत असे.

" या भूमंडळीच्या ठायी

धर्मरक्षी ऐसी नाही

महाराष्ट्र धर्म उरला नाही

 तुम्हाकरिता " 

 या समर्थ रामदास स्वामींच्या वचनात महाराजांच्या पराक्रमाची, अवतार कार्याची माहिती आहे. म्हणूनच अनेक इतिहासकारांनी देखील महाराजांची तुलना अलेक्झांडर, सिझर, नेपोलियन अशा जगप्रसिद्ध सेनानींशी केली आहे. पण महाराज नुसतेच सेनानी नव्हते ते थोर मुत्सद्दी होते. राजकारणाचे रबर तुटेपर्यंत ताणायचे नसते, हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच जयसिंगाचे सामर्थ्य लक्षात येताच महाराजांनी माघार घेतली. पण स्वराज्यातील बारा किल्ले व एक लाख होनाचा मुलुख स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी झाले. खरा यशस्वी कोण तर, जो विजयाचे फलित अधिकाधिक पदरात पाडून घेतो तो व वेळप्रसंगी चार पावले मागे सरतो आणि संधी मिळताच दहा पावले पुढे टाकतो. पराभवात ही आपल्या राज्याचे नुकसान कमीत कमी कसे होईल?  हे पाहतो तो खरा मुत्सद्दी.

   शिवाजी राजे यांचा राजकारणातील जरब पहाल तर आश्चर्याने थक्क व्हाल. आरमारातील दौलतखान व दर्यासारंग यांनी हयगय केल्याचे लक्षात येताच महाराज कठोरपणे लिहितात, " असे नादान थोडे असतील,ऐवज न पाठवून तुम्ही आरमार खोळंबून पाडाल,

एवढी हरामखोरी तुम्ही कराल

 न कळेल तरी ऐसे चाकर आज ठीक केले पाहिजे.

नेमून दिलेल्या कामात कामचुकारपणा करणारा मग तो ब्राह्मण जरी असला तरी महाराज रोखठोकपणे विचारतात, " ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा धरू पाहतो!"

    स्त्रीच्या अब्रूला हात घालणाऱ्याचे हात तोडणारे राजे एकटेच. लाच खाऊन ही जिने जगविता? थू तुमच्या जिनगाणीला!  असे प्रत्यक्ष मामाला उद्देशून म्हणणारे व प्रसंगी त्यांना कैद करणारे देखील महाराज एकटेच. ब्रिटिशांच्या सारखी महासत्ता देखील त्यांच्यापुढे नतमस्तक झालेली दिसते असे.  महाराज म्हणजेच राजे शिवछत्रपती होय.

 महाराजांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मातेचा होता. म्हणूनच स्वकीयांची असो वा परकियांची असो. स्त्रीच्या शिलाचे रक्षण करणे व तिला मातेचे स्थान देणे राजे सर्वश्रेष्ठ कर्तव्य मानतात. म्हणूनच सुभेदाराची सून लूट म्हणून समोर उभी असताना...

 " अशीच आमुची आई असती,

 सुंदर,रूपवती,

 आम्हीही सुंदर झालो असतो!

 वदले छत्रपती!"

 अशा नीतिमान युगपुरुषासमोर शतदा नतमस्तक व्हावे.

   रयत म्हणजे आपली प्रजा. हिचा सांभाळ पुत्रवत केला पाहिजे. हीच तळमळ महाराजांच्या ठाई होती. झुंडशाही नष्ट करून राजांनी अशी शिस्त लावली की लुटीतील एखादा सुतळीचा तोडा देखील लपवून ठेवण्याचे धाडस देखील कोण करत नसेल.जुन्या वतनदारांची वतने खालसा करून नवीन ही कोणास देऊ नयेत असे सक्त दंडक राजांनी घातले. सरंजामशाही नष्ट करून, गुणवत्तेप्रमाणे राज्यकारभारात स्थान देऊन,आपले प्रशासन विलक्षण कार्यक्षम ठेवले.या थोर मानवाच्या जीवन चरित्राकडे पाहताना  एवढेच म्हणावेसे वाटते...

" गीतेचा संदेश तू!

आणि क्रांतीचा आदेश तू!

 संस्कृतीचा मान तू!

आणि आमचा अभिमान तू!

 जय हिंद ! जय शिवराय!